शेतीची माती वाचली तर उत्पादन वाढेल : शास्त्रज्ञ डॉ शांतीकुमार पाटील
शेतीची माती वाचली तर उत्पादन वाढेल : शास्त्रज्ञ डॉ शांतीकुमार पाटील
शिरोळ : प्रतिनिधी
ऊस पिक हे आळशी माणसाचे काम असल्याचा अपप्रचार केला जात आहे. पण ऊसाचे पीक हे शाश्वत असून एखाद्या वेळी पाण्यात बुडून, आगीमध्ये जळून गेला, कमी महिन्याचा असला तरी उसाचे गाळप होते. त्यामुळे उसाचे पीक फायदा करते. व्यवसायिक शेतकरी वाढला पाहिजे. उत्पादन वाढीसाठी शेतीची माती, चांगल्या प्रतीचे बियाणे, खत व्यवस्थापन आणि खतांचे डोस याबाबत जागरूक राहून उत्पादन वाढीचे नेमके तंत्र समजून घेतले पाहिजे. शेतीची माती वाचली तर ऊस उत्पादन वाढणार आहे असे मत पुणे येथील एस व्ही ॲग्रो सोल्युशनचे डायरेक्टर व शास्त्रज्ञ डॉ शांतीकुमार पाटील यांनी व्यक्त केले
येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर सभागृहात श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा झाला. यावेळी प्रमुख व्यक्ती म्हणून डॉ शांतीकुमार पाटील
बोलत होते. शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांनी स्वागत केले.
यावेळी दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले, दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग केले जात आहे. देशभरातील शास्त्रज्ञ, शेती अभ्यासक यांच्या मार्गदर्शनातून शेतीमधील उत्पादन वाढीचे तंत्र समजून दिले जात आहे. कमी खर्चात ज्यादा उत्पादन घेता येते. माणसांप्रमाणेच शेतीच्या मातीत जीव असतो. त्या जिवाणूला लागणाऱ्या घटकांचा अभ्यास करून जमिनीचे आरोग्य चांगले राहिले तर उत्पादन वाढ निश्चित घेता येते.त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचा अभ्यास केला पाहिजे. शेतामध्ये परिश्रम घेण्याची तयारी ठेवा. लागेल ती मदत दत्त कारखाना उद्योग समूहामार्फत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील , संचालक अनिलराव यादव ,मंजूर मेस्त्री ,
पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने -देशमुख, धनाजी पाटील - नरदेकर, बाळासाहेब कोळी, आनंदराव - माने देशमुख, बापूसो गंगधर , भगवान आवळे, पांडुरंग माने , आप्पासाहेब बंडगर , दिलीपराव माने , विजय देशमुख ,आप्पासाहेब गावडे, डॉ दगडू माने, आयुब मेस्त्री यांच्यासह मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना, ऊस विकास अधिकारी ए एस पाटील ,ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी आभार मानले. उदय शिरोळकर यांनी सूत्रसंचालन केले.
